Monday, June 6, 2016

तुझ्यात तू अन माझ्यात हरवलेलो मी.....

निःशब्द तू, निःशब्द मी, अथांग तू, अथांग मी, तुझ्यात तू अन माझ्यात हरवलेलो मी.....

       पूर्वेस उत्तुंग उभा सह्याद्री तर पश्चिमेस क्षितिजापार पसरलेला सिंधूसागर, कुठे दोघांत मैलोनमैलांच अंतर तर कुठे बिलगून एकमेकांत हरवून गेलेले..... स्थितप्रज्ञ वाटावेसे..... सह्याद्री भव्य, रौद्र, बेलाग, उत्तुंग जणू वर्षानूवर्षांच्या तपश्चर्येस बसलेला ​ योगी, त्याच्या नुसत्या तेजानेच प्रभावित करून सोडणारा, भव्यतेत भान विसरून जायला लावणारा….. तर सिंधुसागर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेला, विशाल, गूढ, त्याच्या अथांगतेत हरवून जायला लावणारा. याच्या अंतरंगाचा ठाव कोणासही नाही. जसा मनाचा ठाव घेणं अवघड तसंच याच्या गूढ गर्भाच आकलन अशक्य. सह्याद्री आणि भटाक्याचं नातं जसं अतूट तसंच या सिंधूसागरा सोबतचं नातंही जन्मांतराच. त्याच्या किनाऱ्यावर येणाऱ्या अगणित लाटां आणि मनात येणारे असंख्य विचार यात कमालीची साम्यता. एका मागून एक येणाऱ्या लाटा, पहिली किनाऱ्याला लागत नाही तोवर मागोमाग दुसरी अन तिसरीही, प्रत्येक वेळी स्वतःसोबत काहीनाकाही घेऊन येणारी. मनातले विचारही तसेच एका मागोमाग मनपटलावर उमटणारे, सोबत आनंद, दुःख, राग, चिंता, प्रश्न यांचा पाऊस पाडणारे. किनाऱ्यावरच्या मऊसूत पुळणीवर अनवाणी चालायचं सुख काही औरच. क्षितिजावर मावळलेला रवि, संधीप्रकाशात घराकडे परतणारे पक्षांचे थवे, अनवाणी पायाखाली ओलसर झालेली वाळू, ओहोटीमुळे बाहेर दिसू लागलेला नुकताच न्हाऊन निघाल्यासारखा भासणारा काळाभिन्न खडक, त्या खडकातच विश्व असणारे अन खडकात जणू जिवंतपणा ओतणारे जीव, मध्येच कुठेतरी खडकाआडून उगवलेली समुद्र वनस्पती, इतस्तः विखूरलेले किनाऱ्याच्या वाळूत मिसळून गेलेले शंख-शिंपले, क्षणाचीही उसंत न घेता किनाऱ्याला लागणाऱ्या फेसाळणाऱ्या लाटांचा आवाज तिन्हीसांजेला अधिकच स्पष्ट होत जातो अन त्याबरोबर प्रत्येक लाटेसरशी असंख्य विचारांच्या पाशांतून मन मुक्त होऊ पाहातं. वाळूत उमटून मागे पडणाऱ्या प्रत्येक पावलागणिक मानगुटीवर बसलेल्या नकोश्या विचारांचं ओझं मागे ठेवत हलकंस होऊन जात. या नितांत सुंदर कातरवेळी, अवघा रंग एकची होऊ पाहणाऱ्या सृष्टीत स्वतःला विसरून नाही गेलो तर नवल. सुख-दु:खाच्या कोणत्याही क्षणी या अथांग सागराशी गुज करता येत. कधी याच्यात मनसोक्त डुंबून घेत वाळूत लोळून घेता येत तर कधी दूर किनाऱ्यावर उभं राहून नुसतंच त्याच्याकडे पाहात माझ्याच अंतरंगात डोकावता येत. माझ्यातच हरवलेलो मी याच्या हाकेला नक्की ओ देतो, अंतरंगात स्वतःला शोधून घेतो. डोक्यात जखडलेल्या अहं विचारांच्या पाशांना दूर सारायच असेल तर एखाद्या कातरवेळी या पुळणीवर चालून पाहायला हवं, मनांत साचलेल्या किल्मिशांना लाटेसरशी किनाऱ्यावर सोडून द्यायला हवं, क्षणोक्षणी गर्द होत जाणाऱ्या गहिऱ्या रंगात हरवून जायला हवं.

© भटक्या योगी | मे २०१६

Friday, May 20, 2016

मळभ.......



ग्रीष्मातलं करपवणारं ऊन……. सुकलेली, स्तब्ध पहुडलेली झाड-झुडुपं अधिकच रुक्ष भासणारी……. खोल गेलेल्या विहिरी, वसुंधरेच्या उदरात लुप्त झालेल्या नद्या अनं निर्झर……. कुठल्याश्या कोपऱ्यात शुभ्र नभ पसरून बसलेलं स्वछ निळंशार नभांगण……. उन्हाची काहिली सोसत निपचित पडलेलं एखाद अरण्य नेहमीपेक्षा मोकळ भासणारं……. तिथले निसर्गाशी प्रामाणिक असलेले अनं आपल्याच विश्वात मश्गुल राहणारे लहान-थोर जीव……. स्थितप्रज्ञासारखा समोर उभा ठाकलेला सह्याद्री……. अनं त्या उघड्या रानांतून तिथपर्यंत घेऊन जाणारी ती पायवाट आता अधिकच स्पष्ट दिसू लागलेली……. अशात ग्रीष्मातल्या एखाद्या सकाळी उगवतीला अचानक दाटून आलेले ढग…….  अनं त्या मळभा सोबत मनाला वेध लागतात तुझ्या येण्याचे……. तू इतक्यात येणार नाहीस हे ठाऊक असतं, पण वेड मन तरीही तुझी वाट पहात, क्षितिजाकडे डोळे लावून बसतं……. हे मळभ फक्त काही वेळच असत, पण तरीही मला ते आवडतं कारण ते आठवण करून देतं तू येण्याआधीच्या दिवसाची, दाटलेल्या मेघांची, सुटलेल्या वाऱ्याची, कडाडणाऱ्या विजांची, डोलणाऱ्या झाडांची, पक्षा-पाखरांच्या च्या लगबगीची, आपण एकत्रितपणे अनुभवलेल्या त्या प्रवासांची, हसऱ्या आनंदी सुखाची तर कधी बरसलेल्या सरींबरोबर वाहून गेलेल्या दु:खाची, मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या त्या सर्वच क्षणांची……. वाट पाहतोय तू येण्याची……. मग, येतोयस ना लवकर ?

Friday, February 19, 2016

शिवजयंतीच्या निमित्ताने.......



.......ब्लॉगिंग ला सुरुवात करून आज वर्ष झालं. ​वर्षभरात फार काही लिहिणं झालं नाही, जेमतेम आठ पोस्ट्स. पण काही नवीन करून वर्ष लोटल्याने या दिवशीच्या आठवणी जाग्या झाल्या.

 .......प्रविण अनं मी दोघेही hangout वर होतो, तसे नेहमीच असायचो, एक-दोन दिवसाआड वेळ मिळेल तस मनसोक्त गप्पा मारत बसायचो. आणि त्यादिवशी शिवजयंती म्हणून सकाळीच शुभेच्छा देऊन झाल्या. बोलता-बोलता विषय निघाला कि आज काहीतरी करायला हवंय, पण दोघेही ऑफिसला आल्याने, आता काय करणार असा प्रश्न.

प्रविण : "काही सामाजिक कार्यच होत नाहीये रे."
मी मस्करीच्या सूरात म्हंटल "होतंय ना, चेक पाठवतोय ना आपण."
प्रविण : "हो, पण तेवढंच, प्रत्यक्षात काहीच होत नाहीये."
मी : "त्यासाठी वेळ द्यावा लागेल आपल्याला, विचार करू अनं काढू काहीतरी मार्ग."
त्यानंतर ठाण्यातल्या एका ऐतिहासिक परीसंवादावर गप्पा आणि काही अवांतर गप्पा झाल्यावर आम्ही offline झालो. दुपारनंतर मी ब्लॉग लिहायला घेतला. विषयही त्या दिवसाचे औचित्य साधून घेतलेला… शिवजयंती! संध्याकाळ पर्यंत वेळ मिळेल तसा लिहून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी आल्यावर पहिल्यांदा प्रविणला ब्लॉग लिहितोय सांगून draft e-mail केला, आणि म्हंटलं check  कर अनं तुला वाटतंय तिथे corrections  कर. लगेचच त्याचा reply आला, "वाह!class…. सर्व छान आहे, no need to edit... go ahead dear, its new start...all d best... मोजक्या शब्दांत perfect message पोहोचवायचा."

 …….आज सकाळी उठल्या-उठल्या हे सर्व डोळ्यांसमोर तरळू लागलं. प्रविण… आज तू नाहीस यावर अजूनही विश्वास बसत नाहीये रे. हे सर्व एका अत्यंत वाईट स्वप्नासारखं वाटतंय. वाटतंय अजूनही मी झोपेत आहे अनं मला हे भयंकर स्वप्न पडलंय, अनं मला या स्वप्नातून जाग का येत नाहीये? वाटतंय हे स्वप्न भंगून तू समोर यावस अनं मी तूला कडकडून भेटावं. पण वास्तवाचं भान अधिकच दाहक अनं क्लेशदायक आहे. एकही क्षण असा जात नाहीये कि तुझी आठवण येत नाही, असंख्य आठवणींचा कल्लोळ माजतोय रे मनात. ठरवलेलं ना आपण खूप काही करायचं म्हणून?, मग असा का दूरावलास तू? आता सगळंच नीरस, दिशाहीन वाटू लागलंय. तरीही एक सांगू इच्छितो तूला, मागच्या वर्षीच्या शिवजयंतीत नवीन काही कराव म्हणून ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती आपण, यावर्षीच्या शिवजयंतीच्या निमित्ताने एक वचन देतो तूला, आपण एकत्रितपणे सुरु केलेल्या कार्यात कधीही खंड पडू देणार नाही मी… स्वराज्यवाटाच्या कार्याला कधीही अंतर देणार नाही… अगदी अखेरच्या श्वासापर्यंत.......

तुझा दुर्भागी मित्र,
भटक्या योगी

Wednesday, January 6, 2016

उर्ध्वमूखी भुयारीमार्गाचा....... कोथळीगड (पेठ चा किल्ला)

       नववर्षाचा पहिला दिन....... सरत्या वर्षाला निरोप देऊन ब्रम्ह मुहूर्तावर निघालेली भटक्यांची टोळी....... हेमंत-शिशिरातला लोभसवाणा गार वारा....... एक-दोन तास झोप मिळूनही भल्या पहाटेपासून सुरु झालेले ​गप्पांचे फड....... चुकून मागे राहिलेला आणि मागच्या ट्रेनने एकटाच दिड तास 'बोअरिंग' प्रवास करून आलेला ट्रेकमेट :)....... वाफाळता अमृततुल्य चहा....... गार रानवाऱ्याबरोबरच अंगावर घेतलेली सूर्याची कोवळी किरणं....... दुरून डोंगराच्या पोटातून खेचून काढल्यासारखा दिसणारा कोथळीगडाचा सुळका....... त्याच्या आतून खोदून काढलेल्या पायऱ्यांच मनातलं अप्रूप....... दिवसभराचं भटक्यांचं विविध विषयांच चर्चासत्र....... गडाचा जाणून घेतलेला रक्तरंजित इतिहास....... सो कॉल्ड 'थर्टीफस्ट पार्टीछाप' पब्लिकने केलेला कचरा साफ करून गडाची केलेली स्वच्छता....... अन् डोंगरमित्रांसोबतचा अविस्मरणीय 'ट्रेकानुभव'.......


दोन दिवसा पूर्वी कोथळीगड करायचं नक्की केलं. मावस भाऊ तन्मय अन् मी असे दोघेच तोपर्यंत भिडू होतो, पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळ पर्यंत तन्मय, तेज, शैलेश, अभिजित, विवेक अन् स्वप्निल मिळून सात जणं तयार झालो. सकाळी ४.२५ वाजता सिएसटीहून निघणारी पहिली खोपोली लोकल पकडायचं ठरवून सगळ्यांना तसं कळवलं. ठरल्याप्रमाणे स्वप्नीलने दादर, अभिजितने कुर्ला, मी-तन्मयने मुलुंड, तेजने ठाणे अन् विवेकने डोंबिवलीहून ट्रेन पकडली, तेही ठरल्याप्रमाणे खोपोलीकडचा सर्वात पहिला डब्बा, पैकी शैलेश ठाण्याहून तीच ट्रेन पकडण्यासाठी (खोपोली लोकल नेहमीच फास्ट असते असे समजून :D ) ​प्लॅटफॉर्म नं. ५ ला जाऊन बसला, अन् त्याची हि स्लो खोपोली चूकली. मग काय, एकटाच दहा मिनिटानंतरच्या कर्जतने दिड तासाचा 'बोअरिंग' प्रवास करून आला, आम्ही मात्र पोट धरून हसून घेतलं. सरत्या वर्षाला निरोप देण्याचे प्रत्येकाचे काही ना काही प्लान्स असल्याने रात्रीची झोप एक-दोन तासाच्या वर कुणाची झालीच नव्हती, तरीही पायथ्याला जाईपर्यंत गप्पांचे फड असे काही रंगले कि आत्ताच मस्त सात-आठ तास झोप काढून आलेत.  ट्रेकर्स लोकांचं एक बरं असतं त्यांना सोबत असलेला ट्रेकर ओळखीचाच पाहिजे असं नाही, फक्त 'ट्रेकर' या वळखिनं त्ये जीवाचं मैतर होऊन जातात.

कर्जतला उतरल्यावर डेपोत जाऊन 'यष्टी'ची विचारणा केली, तर तास-सव्वा तासाने आंबिवली 'यष्टी' होती, म्हणून मग टमटम करून आंबिवली गाठण्यावर शिक्कामोर्तब झालं. पण निघण्याआधी चहा नाही घेतला तर पुढं जाणं निव्वळ अशक्यच ओ, म्हणून मग मस्त वाफाळत्या चहाची फर्माईश सुटली, बरोबर टमटमवाल्या काकांनाही सामिल करण्यात आलं. आंबिवलीत दुर्गपालांच्या घरी चहा नाश्त्याची सोय होते हि माहिती काकांकडून मिळाली, मग नाश्ता तिथेच करायचं असं ठरवून आम्ही आगेकूच केली. या तासाभराच्या प्रवासात इतिहास, राजकारण, महाराजांचे वंशज, भूगोल, आजार-विकार, औषधनिर्मिती, भोंदूगिरी एक ना अनेक विषयांना उजाळा मिळाला. तासाभरात गार वारा अंगावर घेत आंबिवलीत पायउतार झालो ते थेट दुर्गपाल गोपाळ सावंत यांच्या घरासमोर. उतरताच पोह्यानबरोबरच पुन्हा चहाची फर्माईश. मस्त चहा-पोह्यानवर ताव मारल्यावर अगदी सज्ज झालो. निघण्याआधी दुपारच्या जेवणाचीही ​ऑर्डर सोडून आम्ही ध्येयाकडे वाटचाल सुरु केली.
प्रशस्त डांबरी रस्त्याने काही अंतर चालून गेल्यावर जिथे डांबरी रस्ता संपतो अन् कच्चा रस्ता सुरु होतो तिथे उजव्या बाजूस झाडावर कोथळीगडाकडे रस्ता दाखवणारा एक अगदी छोटा बोर्ड लावला आहे. इथून पूढली वाट, दगड-मातीची, सोपी, वळणावळणाची, घाटाची अन् दमछाक करणारी. साधारण अर्धा-पाऊण तास चालल्यानंतर कोथळीगड दृष्टीस पडला. त्याचा डोंगराच्या पोटातून खेचून काढल्यासारखा दिसणारा सूळका खूणाऊ लागला.
तिथून थोडं पूढे आल्यानंतर वाट खाली उतरू लागली व कोथळीगड दृष्टीआड गेला. मुख्य वाटेला मध्येच कुठे वळण तर नाही ना?, असं वाटून तेज अन् मी दोन्ही दिशांना थोडं पुढे आणि मागे पाहून आलो, आणि वाट योग्य असल्याची खात्री पटली. इथून साधारण अर्ध्या तासानंतर पेठ गावाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. इथं एका झाडाच्या चौथऱ्यावर गडाकडे कडे वाट दाखवणाऱ्या बाणाची खूण केली आहे. थोड्या वेळाच्या विश्रांतीसाठी थांबलो, तिळाचे लाडू अन् खजूरांचा फडशा पाडला. रॉक क्लायंबर तेजने क्लायंबिंग अन् रोप संदर्भात काही बेसिक गोष्टी उलगडल्या.
गावात एका घरवजा हॉटेल मध्ये पुन्हा एकदा बिनदूधाचा काळा चहा झाला, अन् आम्ही पेठ गावातल्या रस्त्याने गडाची वाट चढण्यास सुरुवात केली. गावात पाण्याच्या व्यवस्थेसाठी एक पाईपलाईन थेट गडावरील पाण्याच्या टाक्यातून आणली आहे. हि पाईपलाईन गडावर जाणाऱ्या वाटेला समांतर आणली आहे. वाट दमछाक करणारी असली तरी झाडाझुडूपांतून जाणारी असल्याने आल्हाददायक होते.
 
साधारण अर्ध्या तासाने आम्ही मुख्य दरवाजापाशी घेऊन जाणाऱ्या पायऱ्यानपाशी येऊन पोहोचलो. मुख्य दरवाजाची बरीच पडझड झाली आहे. इथून डाव्या बाजूस पाण्याच्या टाकांचे समूह लागतात. त्यांना समांतर वाटेने गेल्यास वाट जिथे उजवीकडे वळते, तिथे सुळक्यात थोड्या वरच्या बाजूस आणखी एक छोटेखानी गुहा पहायला मिळते. इथे येणाऱ्या वाऱ्याने क्षणभर स्तब्ध झालो. याच वाटेने गडाच्या सुळक्याला प्रदक्षिणा करता येते.
प्रवेश द्वारातून समोरच दिसतात त्या कातळात खोदून काढलेल्या काही गुहा आणि मंदिर. सर्वात शेवटी आहे ती भैरोबाची प्रशस्त गुहा. या गुहेचे वैशिट्य म्हणजे आतील कोरीवकाम. छताला आधार देणारे खांब, आतील दरवाजा यावर अप्रतिम कोरीव काम केले आहे.
भैरोबाच्या गुहेपासून पुन्हा मंदिरापाशी आल्यावर मंदिराच्या उजव्या बाजूस एक गुहा खोदलेली आहे, तिच्यात उजव्या बाजूस पण पृष्ठभागापासून खाली एक पाण्याचं टाकं आहे. याच गुहेत एक उर्ध्वमूखी भुयार आहे, प्रथमदर्शनी हे लक्षात येत नाही. या भूयारातूनच गडावर जाण्यासाठी पायऱ्या खोदून काढल्या आहेत.
भुयारातून जाणाऱ्या पायऱ्या गुडघ्या इतक्या उंच, दमछाक करणाऱ्या असल्या तरी एकंदरीत हा प्रवास थ्रिलिंग आहे. भुयाराच्या मार्गावर शेवटी एक कातळात कोरलेला दरवाजा अन् उजव्या बाजूस गजशिल्प व शरभशिल्प कोरलेलं आहे. इथून काही पायऱ्या चढून गडावर पोहोचलो. 
कोथळीगडाचा इतिहास - ट्रेकक्षितीज संस्था साभार

{औरंगजेबाने नोव्हेंबर १६८४ मध्ये अब्दुल कादर व अलईबिरादरकानी संभाजींच्या ताब्यातील किल्ले घेण्यासाठी पाठवले. ’कोथळागड’ हा महत्त्वाचा असून जो कोणी तो ताब्यात घेईल, त्याचा ताबा तळकोकणावर राहील हे लक्षात घेऊन अब्दुल कादर याने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो या किल्ल्याच्या जवळपास गेला आणि तेथे राहणार्‍या लोकांना त्याने आपले नोकर म्हणून ठेवून घेतले. मराठे या किल्ल्यातून शस्त्रांची नेआण करतात, हे कळताच अब्दुल कादर व त्याचे ३०० बंदूकधारी नोव्हेंबर १६८४ मध्येच गडाच्या पायथ्याशी पोहोचले. मराठ्यांनी त्र्‍यांना मागे हटवले, पण तरीही काही लोक किल्ल्याच्या मगरकोट दरवाज्याजवळ पोहोचले आणि त्र्‍यांनी ‘दरवाजा उघडा‘ अशी आरडाओरड सुरू केली. किल्ल्यावरील मराठा सैन्याला वाटले की आपलेच लोक हत्यारे नेण्यासाठी आले आहेत, म्हणून त्र्‍यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मोगल सैनिक आत शिरले मराठे व मोगल र्‍यांच्यात लढाई झाली. अब्दुल कादरच्या मदतीसाठी माणकोजी पांढरेही आले, झालेल्या लढाईत मोगलांना यश आले. दुसर्‍याच दिवशी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला, फार मोठी लढाई झाली. या लढाईत बाणांचा व बंदुकींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.या लढाईत किल्ल्यावरचा दारूगोळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गडावर जाणारी सामुग्री मराठ्यांनी लुटल्यामुळे मुघल सैन्याला दारूगोळा व धान्य मिळेनासे झाले. दरम्यानच्या काळात अब्दुल कादरच्या मदतीला कोणीच न आल्यामुळे त्याची परिस्थिती कठीण झाली. वेढा टाकल्यानंतर दहा बारा दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजिजखान याने आपला मुलगा अब्दुलखान याला सैन्यासह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले. अब्दुलखान तेथे पोहचला तेव्हा त्याची वाट अडवण्यासाठी मराठ्यांचा सरदार नारोजी त्रिंबक र्‍यांनी तेथील खोरे रोखून धरले होते. येथेही लढाई झाली नारोजी त्रिंबक व इतर सरदार धारातीर्थी पडले आणि कोथळागड मुघलांच्या ताब्यात गेला. इहमतखानाने नारोजी त्रिंबकाचे डोके रस्त्यावर टांगले किल्ला जिंकून सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली. औरंगजेबाने कोथळागड नावाचा असा कोणता गड अस्तित्वात आहे का? याची खात्री करून मगच अब्दुलखानाला बक्षिसे दिली. मुघलांनी गडाला ‘मिफ्ताहुलफतह‘ (विजयाची किल्ली) असे नाव दिले. फंदफितुरीमुळे मराठ्यांच्या हातून हा मोक्याचा किल्ला निसटला. गड परत मिळवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न सुरू केले. डिसेंबर १६८४ मध्ये गडाकडे जाणार्‍या मुघल सैन्याला मराठ्यांनी अडवले. नंतर मऱ्हामतखानालाही ७००० मराठ्यांच्या तुकडीने अडवले. पण मराठ्यांना यश लाभले नाही. त्यानंतर एप्रिल १६८५ मध्ये ७०० जणांच्या तुकडीने पुन्हा हल्ला केला. २०० जण दोरीच्या शिडीच्या मदतीने किल्ल्यात उतरले. बरेच रक्त सांडले, पण मराठ्यांची फत्ते होऊ शकली नाही. मराठ्यांनी हा महत्त्वाचा किल्ला गमावला होता. पुढे १८१७ च्या नोव्हेंबरमध्ये दुसर्‍या बाजीराव पेशव्याच्या वतीने बापुराव नामक शूर सरदाराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवला. सुमारे १८६२ पर्यंत किल्ल्यावर माणसांचा राबता होता.}

माथ्यावर पाण्याची दोन टाकं वगळता काही अवशेष नाहीत. गडमाथ्यावरुन भीमाशंकरकडील प्रदेश, सिद्धगड, गोरखगड, पदरगड, चंदेरी, प्रबळगड, इर्शाळगड, माणिकगड, माथेरान हा दूरपर्यंतचा मुलूख नजरेत येत होता. सह्याद्रीच हे रांगड रूप डोळ्यांत भरभरून घेतलं. आता सगळ्यांनीच बरोबर आणलेल्या ​ड्राय स्नॅक्सवर ताव मारला. थोडी विश्रांती घेऊन गडफेरी मारून अन् मनासारख्या फ्रेम्स click करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. 
गडमाथा चढून जायच्या आधी प्रवेश द्वारातून वर आल्यावर उजवीकडे गेल्यावर सपाट समतल जागा लागते, तिथे एक तोफ आहे, तोफेपासून अलीकडे काही अंतरावर काही 'थर्टीफस्ट पार्टीछाप' लोकांनी दारूच्या बाटल्या आणि काही बाटल्या फोडून टाकल्या होत्या, बहुदा सरत्या वर्षाला त्यांनी 'त्यांच्या पद्धतीने' निरोप देऊन नववर्षाचे 'स्वागत' (???) केले असावे. हा सर्व कचरा आम्ही गडमाथ्यावर जायच्या आधी प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून ठेवला होता, तो गड उतरताना बरोबर घेतला, अन् आंबिवलीत येऊन दुर्गपालांसमक्ष त्याची विल्हेवाट लावली. 
गड उतरत असताना मनात काही गोष्टी तरळत होत्या....... नोव्हेंबर १६८४ चा रणसंग्राम, 'हर हर महादेव' च्या गर्जनेने दणाणून सोडलेल्या दाही दिशा, शत्रूवर डागलेल्या तोफा, भाले-बाण यांचा दोहो बाजूंनी बरसलेला पाऊस, सळसळत्या पात्याने जमीनदोस्त केलेले गानिमांचे देह, बंदुकींच्या झडलेल्या फैरी, रक्ताचे वाहिलेले पाट, शेकडो मावळ्यांचे बलिदान……. अन् या रक्तरंजित इतिहासाचा साक्षीदार कोथळीगड, आज बनलाय काही पार्टीछाप पब्लिकचा अड्डा. मराठ्यांच्या रक्तरंजित इतिहासाची साक्षीदार असलेली त्यापैकीच ती एक तोफ आज अनुभवतेय या 'सो कॉल्ड' लोकांची हि विकृती, दारूच्या बाटल्यांचा खच, फोडलेल्या बाटल्यांच्या काचा, उघड्या डोळ्यांनी पहातेय वैभवशाली इतिहासाची अवहेलना, पण जिथे मोठ-मोठ्या बलाढ्य आणि संरक्षित गड-दुर्गांची अशा विवंचेनेतून मुक्तता नाही, तिथे या छोटेखानी 'कोथळीगडास' कोण विचारतो?.......

परतून आंबिवलीत येईपर्यंत चार वाजले होते. आता सणकून भूक लागली होती. दुर्गापालांकडे पोहोचताच ​झक्कास चिकन थाळी वर यथेच्छ ताव मारला अन् गप्पांच्या फडामध्ये पुन्हा एकदा रंगून गेलो, नववर्ष दिनी आणखी एक अविस्मरणीय 'ट्रेकानुभव' गाठीशी बांधला गेला होता....... 

सर्व हक्क सुरक्षित  © !ncredible सह्याद्री, २०१६
गूगल मॅप व्हू - कोथळीगड

Friday, July 31, 2015

गुरुर्देवो सह्याद्री !

​       सह्याद्री....... उत्तुंग, गूढ, रम्य, दुर्गम, बेलाग, ​अतुल्य....... डोंगर-दऱ्यांत विसावलेल्यांचा पाठीराखा अन् माझा गुरुवर्य ! निसर्गात जावं, रमावं, त्याच्याशी एकरूप व्हाव हे शिकवलं ते यानेच. रोजच्या माणूस प्राण्यांच्या गर्दीत हरवून जाणारा मी धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून जेव्हा-जेव्हा सह्याद्रीत जातो, तेव्हा-तेव्हा तो उभा ठाकलेला असतो दर वेळी नव-नवीन काहीतरी शिकविण्यासाठी. कधी तो घेऊन जातो मला त्याच्या वैभवशाली इतिहासात....... कधी त्याच्या गर्भात दडलेल्या अनाकलनीय भूगोलात....... कधी घनदाट निबीड रानांत....... कधी स्तब्ध करायला लावतो त्याच्या जैवविविधतेत.......तर कधी हरखून जायला लावतो त्याच्या कोसळणाऱ्या जलप्रपातांत. जेव्हा-जेव्हा त्याच्या कुशीत विसावतो तेव्हा देहभान हरपून जातं. त्याचं रांगडेपण, दुर्गम कडे-कपाऱ्या, बेलाग सुळके अबोल राहून पण खूप काही शिकवून जातात. कसलासा अहंकार कधीच गळून पडतो आणि या जगात मी किती क्षुद्र आहे याची जाणीव होते. जगातल्या कुठल्याच शाळेत मिळालं नसतं ते शिक्षण मला त्याने दिल. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी या गुरुर्देवो सह्याद्रीला या भटक्याचा त्रिवार प्रणाम आणि हा छोटासा ब्लॉग त्यालाच समर्पित.......!



सर्व हक्क सुरक्षित © !ncredible सह्याद्री 

Thursday, July 9, 2015

निसर्गाचा विलोभनीय कॅनव्हास उलगडणारा…….किल्ले सोंडाई !

​    कृष्ण-धवल मेघांत नटलेला आसमंत……. ​मळभात लपलेला सूर्य……. नुकत्याच अंकुरु लागलेल्या हिरवाईने नटू लागलेली वसुंधरा……. मेघ पिऊन ओलसर झालेली माती……. नुकताच न्हाऊन निघालेला काळाभिन्न कातळ, अधिकच गर्द भासणारा……. दगड-धोंड्यानतून वाट काढत खळाळू लागलेले निर्झर……. कुठल्याश्या वावरात नांगरु लागलेली सर्जा-राजाची जोडी……. तर कुठे लाल-तपकिरी माती आडून डोकावू लागलेले भात रोपाचे हिरवेगार गालिचे, वाऱ्याबरोबर डोलू लागताच हिरवी मखमल भासणारे……. मन धुंद करणारा रानवारा……. अनं जोडीला खेळ ऊन सावल्यांचा……

…….अशाच ऊन-सावल्यांच्या खेळात अविस्मरणीय ठरला ट्रेक सोंडाई. इथून सृष्टीचं मनोहारी रुप न्याहाळताना देह-भान नाही हरपलं तर नवलच. निसर्गाचा उलगडलेला हा विलोभनीय कॅनव्हास मनात कायमचं घर करून गेला.

डोंगरमित्र अव्या (अविनाश), दिलीप आणि आशिषसह सकाळी आठ वाजता कर्जत स्थानक गाठलं. सकाळचा नाश्ता केल्याशिवाय गाडी पुढे हाकणार कशी, म्हणून इडली-चटणी वर यथेच्छ ताव मारला (अर्थात तिथे दुसरं काही नव्हतंच) आणि त्यावर झक्कास वाफाळता चहा, अ:हाहाहा.  'आता गाडी कुट बी हाका कि राव, थकणार न्हाई अनं थांबनार बी न्हाई !'

कर्जतहून टमटम ने तीन किलोमीटरवरील बोरगाव फाट्यावर चौकटी पायउतार झाली. इथून पुढला प्रवास अकरा नंबरच्या गाडीने तोही प्रशस्त डांबरी सडकेने.


काही अंतर चालून गेल्यावर मोरबे धरणाचा जलाशय आणि समोरच उभा असलेल्या उत्तुंग इरशाळगडाने लक्ष वेधून घेतले. जलाशय आणि इरशाळचं हे दृश्य अप्रतिमच…….

पुढल्या वळणावर भेटली ती नांगरणी करणारी जीवा-शिवाची बैल जोडं आणि अवघ्या जगाचा अन्नदाता बळीराजा……. मनात तरळल्या त्या कवितेच्या ओळी, 'सुंदर ते ध्यान उभे बांधावरी, नांगर खांद्यावरी घेवोनिया…….'

तर दुसऱ्या बाजूस दृष्टीस पडला वसुंधरेच्या लाल-तपकिरी फरशीवर अंथरलेला हिरवाकंच गालिचा……. वाऱ्याबरोबर तरंग उमटू लागताच मखमलीलाही लाजवेल इतका विलोभनीय……

जलाशयापासून बऱ्यापैकी पुढे आल्यावर वाट सुरु होते ती चढणीची अन वळणावळणाची……
तासा-दीड तासाच्या सोप्या चालीनंतर सोंडेवाडीत येऊन पोहोचलो……. डोंगराच्या कुशीत वसलेली एक छोटीशी वाडी……. इथूनच एक मुख्य वाट गडाच्या पायथ्याच्या पठारापर्यंत जाते……. वाडीतून आलेल्या एका मामांना विचारलं, "गडावर जाणारी वाट कोणती", "याच वाटेनं जा, आनि समोर त्ये मोठ्ठ झाड दिसतंय ना, तितन उजवीकडे वळा"…….अन मामांनी दाखवलेली वाट पकडली. 

साधारण पंधरा मिनिटात त्या दगड मातीच्या प्रशस्त वाटेने एका पठारावर येऊन पोहोचलो. इथेच वावर्ले गावातून येणारी वाट येऊन मिळाली आहे. इथून अर्ध्या तासात एका कातळापाशी येऊन थांबलो. इथे कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसतात, पण त्या बऱ्यापैकी झिजलेल्या आहेत. पुढे दोन ठिकाणी वाट अगदी कातळकड्यावरून जाते.


या  ट्राव्हर्स नंतर येऊन पोहोचलो पाण्याने काठोकाठ भरलेल्या जोड टाक्यांपाशी……. नितळ, स्वछ पाणी जणू नभांतून बरसलेल अमृत या डोंगर-दगडांनी आपल्यात साठवून ठेवलंय……. मनसोक्त अमृत पिऊन घेतलं अन दोन क्षण विसावलो……


इथून पुढे थोड्या चढाईनंतर साधारण पंधरा-वीस फुटी कातळटप्प्यापाशी पोहोचलो, जिथे सध्या लोखंडी शिडी बसवली आहे. सगळा थ्रिलच निघून गेला आहे राव, असो. शिडी चढून वर गेल्यावर उजव्या बाजूस मोठ पाण्याच टाक लागलं ज्यात आधारासाठी दोन दगडी खांबही आहेत, पण पाणी पिण्यायोग्य नव्हतं. डाव्या बाजूच्या वाटेने गडमाथ्यावर पोहोचलो, आणि समोर उभं होतं निसर्गाच्या कॅनव्हासवर रेखाटलेलं विलोभनीय दृष्य. 

तीनही बाजूस डोंगररांगा……. समोरच मोरबे धरणाचा जलाशय आणि त्याला डोंगर-दऱ्यातून खळाळत येऊन मिळणारे पाणी……. जलाशयाच्या उजव्या बाजूस उभा ठाकलेला इरशाळगड अन सर्वत्र उधळण हिरव्या रंगाची……. आसमंतात दाटलेले नभ……. सोबतीला मन धुंद करणारा रानवारा, क्षणा-क्षणाला बेभान करत जाणारा……. निसर्गाच्या या लोभसवाण्या रूपाने अक्षरशः वेडं लावलं…… सर्वांग सुंदर सह्याद्री, स्वर्गाहून सुंदर सह्याद्री !


​गडमाथा फारच लहान, बहुदा याचा वापर फक्त टेहळणी साठी होत असावा. सोंडाई देवीची मूर्ती वगळता इथे काहीही अवशेष नाहीत. ​गप्पांच्या फडात दोन-अडीच तास कसे गेले कळलंच नाही. पुन्हा एकदा हे सर्व डोळ्यांत साठवून परतीच्या वाटेला लागलो. वेळ बराच होता, म्हणून येताना वावर्ल्याची वाट धरली, राना-वनातून, धबधब्यांतून  पायवाटेने जाणारी आणि अगदीच निर्मनुष्य……. एका ठिकाणी वाट चुकून जंगलात, काट्यात घुसलो. साधारण दीड-दोन तासांनंतर ठाकूरवाडीत पोहोचलो, इथून खाली उतरल्यावर वावर्लेचं धरण लागल, मनसोक्त डुंबून घेतलं. थोडा वेळ थांबून वावर्ल्याकडे निघालो. वाटेत एका मामांना विचारलं, "मामा, कर्जतला जायला एष्टी कुठून मिळेल?", "गावातूनच सरळ बाहेर पडा, एष्टीस्टाप आहे. पन इथन कुटून आलात?", "सोंडाई गडावर गेलो होतो, मामा." "मग इथन रानातून आलात?" मामांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. आम्ही 'हो' म्हणत पुढे सटकलो. दिलीप ला हसत म्हंटल, "निव्वळ मस्ती, दुसर काय?" :) कर्जत- पनवेल हायवेला लागताच मस्त मिसळ-पाव आणि लस्सी चा फडशा पाडला, आणि पुढच्या ट्रेकच्या प्लान्सच्या विचारात गुंतून गेलो.......




सर्व हक्क सुरक्षित © !ncredible सह्याद्री

Friday, June 19, 2015

.......मनं पाऊस पाऊस !

​​नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं

अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात……. 

 


​ …….अगदी वेळेवर आलास बघ यावर्षी. तू येण्याआधी हुरहूर लागून राहिली होती बघ, म्हंटल येतोस कि नाही यावेळी तरी लवकर. ऊन 'मी' म्हणत असलेलं. घामाच्या धारांनी तर पुरतं नको करून सोडलेलं. मध्यंतरी तू लांबणीवर जाण्याच्या बातम्या येऊन गेल्या. उगाच मन कावरंबावरं झालेलं, वाटलं तू पुन्हा वाट पाहायला लावणार कि काय?…….

…….आणि अचानक त्यादिवशी अंधारू लागलं, नभ दाटून आलं, थंड वाऱ्याची झुळुक तुझ्या येणार असल्याचा इशारा देऊन गेली. क्षणात बदललेल्या वातावरणाने मन मोहून गेलं, प्रसन्न वाटू लागलं, आणि तू आलास, बरसलास, उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर अगदी ठरलेल्या दिवशी शाळा सुरु व्हावी त्याप्रमाणे पाहिल्याच दिवशी हजेरी लावलीस.

हुश्श्श्श्श्श…….प्राणी, पक्षी, माती, माणसं, डोंगर, नद्या, शेतं सगळ्यांनीच एक नि:श्वास टाकला. तुझ्या येण्याने सगळेच सुखावले. सगळ्यांनाच वेड लावणारा तू……. मी तरी तुझ्यापासून अलिप्त कसा राहू? मला तर तू खूप पूर्वीच वेडं लावलयस. आता आठवत नाही नक्की कधीपासून तुझ्या प्रेमात पडलोय. पण 'चातका' सारखा दरवर्षी तुझ्या येण्याकडे डोळे लावून बसतो. आणि तू आलास कि तुझ्या येण्याने वेडा होऊन जातो……. पहिल्या थेंबाने येणारा मातीचा गंध श्वासात भरून घेतो……. चिंब-चिंब भिजून घेतो……. धुक्यात स्वतःला हरवून घेतो……. पाऊस जगून घेतो.

……. तू आल्यानंतर आज तिसऱ्यांदा भिजून आलोय, उगाच वाट फुटेल तिथे भटकून आलोय. थंडगार वारा, रिमझिम कोसळणाऱ्या धारा पुन्हा-पुन्हा अंगावर घेऊन आलोय. पण इतक्यातच मी समाधान थोडचं मानणार? आत्ताशी तर आलायस, 'अभी तो शुरुवात है'. अजून भरपूर भिजून घ्यायचयं. कोसळणारा पाऊस, गरमा-गरम कांदा भजी, चहा आणि सोबतीला चार-पाच टाळकी. …….चल, लागतोच आता पुढच्या प्लान्सच्या तयारीला. …….येतोय पुन्हा: तुझ्यात हरवून जायला.……. !










सर्व हक्क सुरक्षित © !ncredible सह्याद्री

Wednesday, June 10, 2015

कातळ-कोरीव पायऱ्यांचा…….कलावंतीण !

​​
.......उंचच उंच कातळ, दऱ्यान मधून भणाणणारा वारा .......माती, झाडा-झुडुपांचा तो मन वेडावणारा गंध .......थकवणारे, घामट काढणारे कातळ-टप्पे .......निसरडी दगड-माती .......उंच कड्यावर बसून न्याहाळलेला नजरेत येईल तिथपर्यंतचा प्रदेश आणि आसमंत.......

.......हे सगळ पुन्हा-पुन्हा अनुभवायचं, डोळ्यांत, श्वासात भरून घायचं .......कुठल्याश्या खोपट्यात बसून पिठलं-भाकरीवर ताव मारायचा आणि मस्त जमिनीवर पाठ टेकायची .......भटक्यासाठी यापेक्षा मोठ सुख ते काय ???

'हापिसातल्या' एसीत अनं घरातल्या पंख्याखाली हे सुख थोडंच मिळणार? .......'उगाच भटकून' (हे घरच्यांच्या भाषेत) बरेच दिवस लोटलेले, आता पुन्हा डोंगर-दऱ्यातं भटकायला जायचं, या नुसत्या विचारानेच उत्साह वाटू लागलेला.......
.......मग काय उचलली ​सँक, अनं वाट चालू लागलो, पुन्हा एकदा त्याच्या दिशेने .......सह्याद्री .......माझा सांगाती !


माथेरान डोंगररांगेत येणारा पनवेल जवळचा कलावंतीण सुळका आणि त्याच्या प्रबळगडावरून दिसणाऱ्या कातळात खोदलेल्या पायऱ्या याचं विशेष अप्रूप मनात होत.

.......यावेळी या उंच सुळक्यावरून निसर्गाच विलोभनीय दृष्य न्याहाळायचं, अनुभवायचं हे पक्कं केलं. बरोबर चिनू, निलेशही तयार झाले. स्वप्न्या, तेज, निखिल आणि इतर डोंगरमित्र माणिकगडाकडे निघालेले, अनपेक्षितपणे पनवेल बस डेपोत भेटले. पनवेलहून लाल डब्यात चढलो. तुरळक एक-दोन डोकी, बाकी 'यष्टी' रिकामी, तिघेही ऐसपैस बसलो. साधारण अर्ध्या तासात पायथ्याच्या गावी पोहोचलो.


ठाकूरवाडीत उतरताच मागे दिसला तो उंच, अजस्त्र , विस्तीर्ण पठार असलेला किल्ले मुरंजन म्हणजेच प्रबळगड आणि डाव्या बाजूचा सुळका कलावंतीण. माथेरानच्या सनसेट पॉइंट वरून दिसणारा सूर्यास्त दिसतो, तो याच दोहोंच्या बेचक्यात. 

शहराच्या बऱ्याच जवळ असल्याने गावातल्या बऱ्याचश्या शेतजमिनी 'सेकंड होम' वाल्यांनी कुंपण घालून ठेवलेल्या. 'निसर्गात जा', हे 'या' लोकांनी जरा जास्तच सिरिअसली घेतलंय. :) 

गावातून जाणारा एक बऱ्यापैकी मोठा रस्ता साधारण १५-२० मिनिटात डोंगराच्या पायथ्याशी नेऊन सोडतो. इथं शिव सह्याद्री संस्थेने गडाची माहिती देणारा फलक लावला आहे, जो सध्या बिकट अवस्थेत आहे. इथून पुढचा प्रवास पायवाटेने करायचा.

सक्काळ-सकाळी रानातून सरपणासाठी लाकड गोळा करून, मोळ्या बांधून आणणाऱ्या काही गावकरी स्त्रिया दिसल्या .......अनं आठवली ती शेणाने सारवलेली चूल, सरपण जळतानाचा धूर आणि गंध.......

पुढे प्रबळमाची पर्यंत जाणारी वाट बऱ्यापैकी चांगली आहे, कधी सपाटी, कधी चढाई, तर कधी घामट काढणारी. सूर्यदेव हळूहळू वर येऊ लागलेला, तसा अवघा सह्याद्री आणि चोहोबाजूंचा भूप्रदेश कोवळ्या किरणांत न्हाऊन निघालेला.......जस-जसे वर चढू लागलो तस-तसा लांबवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येऊ लागला.......

थोडं पुढ गेल्यावर दिसल्या त्या कातळात कोरून ठेवलेल्या, शेंदूर फासलेल्या दोन सुंदर मूर्त्या…… एक 'गणेशाची' तर दुसरी 'अंजनी सूताची' .......दोन्ही मूर्त्यांच्या मध्ये दगडात एक घंटा अडकवून ठेवलेली. पायातले शूज काढले आणि मनोमन वंदन केलं. तिथेच जरा पाणी प्यायलो, दोन क्षण थांबून मग निघालो. निघताना मनात आलं, कुणी-कधी कोरल्या असतील इथे या मुर्त्या? .......सध्या तरी माहित नाही.

थोडं चढून पुढे गेल्यावर झाडाच्या सावलीच्या ठिकाणी एक खुर्ची टाकून बसलेला एक तरुण दिसला. न विचारताच त्याने माहिती द्यायला सुरुवात केली, 'प्रबळगड संवर्धन आदिवासी सामाजिक विकास संस्थे'तर्फे संकट प्रसंगी पर्यटकांना मदत पोहोचवली जाते. संस्थेकडून प्रत्येक पर्यटकामागे १० रुपये घेतले जातात, त्याची पावतीही दिली जाते. आणि हा निधी आदिवासी गावाच्या विकासासाठी वापरला जातो. एका अर्थाने अशा प्रसंगी मदत पोहोचवण, खरोखरच स्तुत्य आहे.

तिथून पुढे निघालो तो अजून प्रबळमाची यायची होती. मुरंजन च्या पठारामागून सूर्य हळूहळू आपले दर्शन देत होता…….

सणकून भूक लागलेली, प्रबळमाचीत पोहोचताच कांदे-पोह्यावर ताव मारला. चहाने सगळा क्षीण जाऊन तरतरी आली. हा चहा पण काय चीज आहे? कितीही कंटाळा येवो, थकवा येवो, एक घोट घेतला कि हुरूप येतो, नाही? ज्याने हे अजब रसायन शोधून काढलं त्याला खरंच सलाम !
आता इथून पुढे उजवीकडची वाट प्रबळगडा कडे तर डावीकडची कलावंतीण कडे गेलेली. आदल्या रात्री वस्तीला गेलेले काही डोंगरमित्र उतरताना भेटले, औपचारिक ओळख परेड झडली. साधारण अर्ध्या-पाउण तासात दाटीवाटीच्या झाडीतून आणि निसरड्या दगड-मातीतून, चढाईच्या वाटेने हाश-हूश करत प्रबळ आणि कलावंतीणच्या मधल्या खिंडीत येऊन पोहोचलो. समोर पाहतो तर कलावंतीणचा तो उभा अजस्त्र पहाड काळजात धस्स करून गेला. वैशिष्ट्य म्हणजे कातळात खोदून काढलेल्या उभ्या पायऱ्या सहजासहजी दिसत नाहीत.

…….चढाईला सुरुवात केली तशी कातळातल्या या उभ्या पायऱ्यान्नी भुरळच पाडली. पायऱ्या अप्रतीम कोरून काढल्या आहेत, ओबड-धोबडपणा बिलकूल नाही, एक-एक पायरी साच्यामध्ये घडवल्यासारखी. इतक्या अवघड ठिकाणी कुणी आणि कशा खोदून ठेवल्या असतील ? काही ठिकाणी रुंद तर काही ठिकाणी अरुंद.
पायऱ्या चढताना एका बाजूला कातळभिंत तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. मागे वळून पहायची सोय नाही, डोकं नक्कीच गरगरणार.

पायऱ्या चढून गेल्यावर थोड्या सपाट जागेवर पोहोचलो. इथून पुढे एक पायवाट शेवटच्या कातळ टप्प्याकडे गेलेली. इथे कोणत्याही पायऱ्या नाहीत, कातळाचे होल्ड्स घेऊन वर पोहोचायचं, रोप असेल तर उत्तम.

आमच्याकडे रोप नव्हता पण आधी आलेल्या एका ग्रुपने रोप लावून ठेवलेला, त्याचा आधार घेऊन अंतिम टप्पा गाठला.
.......सुळक्यावर कोणत्याही प्रकारचे अवशेष नाहीत, माथाही लहान पंचवीस-तीस माणसं बसतील इतका. पण इतक्या अवघड ठिकाणी पायऱ्या खोदून वाट केली आहे, याचा अर्थ इथे नक्कीच काहीतरी असावं, बहुदा जे आज काळाच्या ओघात लुप्त झालंय. पण काय होत नक्की?, कसं होत?, कसं घडवलं असेल? प्रयोजन काय? एक ना अनेक प्रश्न मनात येऊन गेले. ऐतिहासिक कागदपत्र, 'gazetteers' मध्येही याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.



.......इथून नजरेत येत होता तो क्षितिजापर्यंत पसरलेला विस्तीर्ण भूप्रदेश, निळशार आभाळ, पायथ्याची वस्ती, तर तीनही बाजूस पसरलेल्या सह्याद्रीच्या लांबच-लांब पर्वतरांगा, खोल दऱ्या, आणि समोरच विस्तीर्ण पठार आणि घनदाट जंगल असलेला अजस्त्र प्रबळगड. इथल्या भणाणणाऱ्या वाऱ्याने मंत्रमुग्ध करून सोडलं. सह्याद्रीच हे रौद्र-विराट सौंदर्य डोळ्यात भर-भरून घेतलं, वारा पिऊन घेतला, शिवगर्जना दिली आणि तिथेच थोडा वेळ पाठ टेकली .......काही क्षण सगळ काही विसरून गेलो .......हरवलो .......उरलो फक्त सह्याद्री आणि मी.......



सर्व हक्क सुरक्षित © !ncredible सह्याद्री