Thursday, July 9, 2015

निसर्गाचा विलोभनीय कॅनव्हास उलगडणारा…….किल्ले सोंडाई !

​    कृष्ण-धवल मेघांत नटलेला आसमंत……. ​मळभात लपलेला सूर्य……. नुकत्याच अंकुरु लागलेल्या हिरवाईने नटू लागलेली वसुंधरा……. मेघ पिऊन ओलसर झालेली माती……. नुकताच न्हाऊन निघालेला काळाभिन्न कातळ, अधिकच गर्द भासणारा……. दगड-धोंड्यानतून वाट काढत खळाळू लागलेले निर्झर……. कुठल्याश्या वावरात नांगरु लागलेली सर्जा-राजाची जोडी……. तर कुठे लाल-तपकिरी माती आडून डोकावू लागलेले भात रोपाचे हिरवेगार गालिचे, वाऱ्याबरोबर डोलू लागताच हिरवी मखमल भासणारे……. मन धुंद करणारा रानवारा……. अनं जोडीला खेळ ऊन सावल्यांचा……

…….अशाच ऊन-सावल्यांच्या खेळात अविस्मरणीय ठरला ट्रेक सोंडाई. इथून सृष्टीचं मनोहारी रुप न्याहाळताना देह-भान नाही हरपलं तर नवलच. निसर्गाचा उलगडलेला हा विलोभनीय कॅनव्हास मनात कायमचं घर करून गेला.

डोंगरमित्र अव्या (अविनाश), दिलीप आणि आशिषसह सकाळी आठ वाजता कर्जत स्थानक गाठलं. सकाळचा नाश्ता केल्याशिवाय गाडी पुढे हाकणार कशी, म्हणून इडली-चटणी वर यथेच्छ ताव मारला (अर्थात तिथे दुसरं काही नव्हतंच) आणि त्यावर झक्कास वाफाळता चहा, अ:हाहाहा.  'आता गाडी कुट बी हाका कि राव, थकणार न्हाई अनं थांबनार बी न्हाई !'

कर्जतहून टमटम ने तीन किलोमीटरवरील बोरगाव फाट्यावर चौकटी पायउतार झाली. इथून पुढला प्रवास अकरा नंबरच्या गाडीने तोही प्रशस्त डांबरी सडकेने.


काही अंतर चालून गेल्यावर मोरबे धरणाचा जलाशय आणि समोरच उभा असलेल्या उत्तुंग इरशाळगडाने लक्ष वेधून घेतले. जलाशय आणि इरशाळचं हे दृश्य अप्रतिमच…….

पुढल्या वळणावर भेटली ती नांगरणी करणारी जीवा-शिवाची बैल जोडं आणि अवघ्या जगाचा अन्नदाता बळीराजा……. मनात तरळल्या त्या कवितेच्या ओळी, 'सुंदर ते ध्यान उभे बांधावरी, नांगर खांद्यावरी घेवोनिया…….'

तर दुसऱ्या बाजूस दृष्टीस पडला वसुंधरेच्या लाल-तपकिरी फरशीवर अंथरलेला हिरवाकंच गालिचा……. वाऱ्याबरोबर तरंग उमटू लागताच मखमलीलाही लाजवेल इतका विलोभनीय……

जलाशयापासून बऱ्यापैकी पुढे आल्यावर वाट सुरु होते ती चढणीची अन वळणावळणाची……
तासा-दीड तासाच्या सोप्या चालीनंतर सोंडेवाडीत येऊन पोहोचलो……. डोंगराच्या कुशीत वसलेली एक छोटीशी वाडी……. इथूनच एक मुख्य वाट गडाच्या पायथ्याच्या पठारापर्यंत जाते……. वाडीतून आलेल्या एका मामांना विचारलं, "गडावर जाणारी वाट कोणती", "याच वाटेनं जा, आनि समोर त्ये मोठ्ठ झाड दिसतंय ना, तितन उजवीकडे वळा"…….अन मामांनी दाखवलेली वाट पकडली. 

साधारण पंधरा मिनिटात त्या दगड मातीच्या प्रशस्त वाटेने एका पठारावर येऊन पोहोचलो. इथेच वावर्ले गावातून येणारी वाट येऊन मिळाली आहे. इथून अर्ध्या तासात एका कातळापाशी येऊन थांबलो. इथे कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसतात, पण त्या बऱ्यापैकी झिजलेल्या आहेत. पुढे दोन ठिकाणी वाट अगदी कातळकड्यावरून जाते.


या  ट्राव्हर्स नंतर येऊन पोहोचलो पाण्याने काठोकाठ भरलेल्या जोड टाक्यांपाशी……. नितळ, स्वछ पाणी जणू नभांतून बरसलेल अमृत या डोंगर-दगडांनी आपल्यात साठवून ठेवलंय……. मनसोक्त अमृत पिऊन घेतलं अन दोन क्षण विसावलो……


इथून पुढे थोड्या चढाईनंतर साधारण पंधरा-वीस फुटी कातळटप्प्यापाशी पोहोचलो, जिथे सध्या लोखंडी शिडी बसवली आहे. सगळा थ्रिलच निघून गेला आहे राव, असो. शिडी चढून वर गेल्यावर उजव्या बाजूस मोठ पाण्याच टाक लागलं ज्यात आधारासाठी दोन दगडी खांबही आहेत, पण पाणी पिण्यायोग्य नव्हतं. डाव्या बाजूच्या वाटेने गडमाथ्यावर पोहोचलो, आणि समोर उभं होतं निसर्गाच्या कॅनव्हासवर रेखाटलेलं विलोभनीय दृष्य. 

तीनही बाजूस डोंगररांगा……. समोरच मोरबे धरणाचा जलाशय आणि त्याला डोंगर-दऱ्यातून खळाळत येऊन मिळणारे पाणी……. जलाशयाच्या उजव्या बाजूस उभा ठाकलेला इरशाळगड अन सर्वत्र उधळण हिरव्या रंगाची……. आसमंतात दाटलेले नभ……. सोबतीला मन धुंद करणारा रानवारा, क्षणा-क्षणाला बेभान करत जाणारा……. निसर्गाच्या या लोभसवाण्या रूपाने अक्षरशः वेडं लावलं…… सर्वांग सुंदर सह्याद्री, स्वर्गाहून सुंदर सह्याद्री !


​गडमाथा फारच लहान, बहुदा याचा वापर फक्त टेहळणी साठी होत असावा. सोंडाई देवीची मूर्ती वगळता इथे काहीही अवशेष नाहीत. ​गप्पांच्या फडात दोन-अडीच तास कसे गेले कळलंच नाही. पुन्हा एकदा हे सर्व डोळ्यांत साठवून परतीच्या वाटेला लागलो. वेळ बराच होता, म्हणून येताना वावर्ल्याची वाट धरली, राना-वनातून, धबधब्यांतून  पायवाटेने जाणारी आणि अगदीच निर्मनुष्य……. एका ठिकाणी वाट चुकून जंगलात, काट्यात घुसलो. साधारण दीड-दोन तासांनंतर ठाकूरवाडीत पोहोचलो, इथून खाली उतरल्यावर वावर्लेचं धरण लागल, मनसोक्त डुंबून घेतलं. थोडा वेळ थांबून वावर्ल्याकडे निघालो. वाटेत एका मामांना विचारलं, "मामा, कर्जतला जायला एष्टी कुठून मिळेल?", "गावातूनच सरळ बाहेर पडा, एष्टीस्टाप आहे. पन इथन कुटून आलात?", "सोंडाई गडावर गेलो होतो, मामा." "मग इथन रानातून आलात?" मामांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. आम्ही 'हो' म्हणत पुढे सटकलो. दिलीप ला हसत म्हंटल, "निव्वळ मस्ती, दुसर काय?" :) कर्जत- पनवेल हायवेला लागताच मस्त मिसळ-पाव आणि लस्सी चा फडशा पाडला, आणि पुढच्या ट्रेकच्या प्लान्सच्या विचारात गुंतून गेलो.......




सर्व हक्क सुरक्षित © !ncredible सह्याद्री

No comments:

Post a Comment