Friday, February 19, 2016

शिवजयंतीच्या निमित्ताने.......



.......ब्लॉगिंग ला सुरुवात करून आज वर्ष झालं. ​वर्षभरात फार काही लिहिणं झालं नाही, जेमतेम आठ पोस्ट्स. पण काही नवीन करून वर्ष लोटल्याने या दिवशीच्या आठवणी जाग्या झाल्या.

 .......प्रविण अनं मी दोघेही hangout वर होतो, तसे नेहमीच असायचो, एक-दोन दिवसाआड वेळ मिळेल तस मनसोक्त गप्पा मारत बसायचो. आणि त्यादिवशी शिवजयंती म्हणून सकाळीच शुभेच्छा देऊन झाल्या. बोलता-बोलता विषय निघाला कि आज काहीतरी करायला हवंय, पण दोघेही ऑफिसला आल्याने, आता काय करणार असा प्रश्न.

प्रविण : "काही सामाजिक कार्यच होत नाहीये रे."
मी मस्करीच्या सूरात म्हंटल "होतंय ना, चेक पाठवतोय ना आपण."
प्रविण : "हो, पण तेवढंच, प्रत्यक्षात काहीच होत नाहीये."
मी : "त्यासाठी वेळ द्यावा लागेल आपल्याला, विचार करू अनं काढू काहीतरी मार्ग."
त्यानंतर ठाण्यातल्या एका ऐतिहासिक परीसंवादावर गप्पा आणि काही अवांतर गप्पा झाल्यावर आम्ही offline झालो. दुपारनंतर मी ब्लॉग लिहायला घेतला. विषयही त्या दिवसाचे औचित्य साधून घेतलेला… शिवजयंती! संध्याकाळ पर्यंत वेळ मिळेल तसा लिहून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी आल्यावर पहिल्यांदा प्रविणला ब्लॉग लिहितोय सांगून draft e-mail केला, आणि म्हंटलं check  कर अनं तुला वाटतंय तिथे corrections  कर. लगेचच त्याचा reply आला, "वाह!class…. सर्व छान आहे, no need to edit... go ahead dear, its new start...all d best... मोजक्या शब्दांत perfect message पोहोचवायचा."

 …….आज सकाळी उठल्या-उठल्या हे सर्व डोळ्यांसमोर तरळू लागलं. प्रविण… आज तू नाहीस यावर अजूनही विश्वास बसत नाहीये रे. हे सर्व एका अत्यंत वाईट स्वप्नासारखं वाटतंय. वाटतंय अजूनही मी झोपेत आहे अनं मला हे भयंकर स्वप्न पडलंय, अनं मला या स्वप्नातून जाग का येत नाहीये? वाटतंय हे स्वप्न भंगून तू समोर यावस अनं मी तूला कडकडून भेटावं. पण वास्तवाचं भान अधिकच दाहक अनं क्लेशदायक आहे. एकही क्षण असा जात नाहीये कि तुझी आठवण येत नाही, असंख्य आठवणींचा कल्लोळ माजतोय रे मनात. ठरवलेलं ना आपण खूप काही करायचं म्हणून?, मग असा का दूरावलास तू? आता सगळंच नीरस, दिशाहीन वाटू लागलंय. तरीही एक सांगू इच्छितो तूला, मागच्या वर्षीच्या शिवजयंतीत नवीन काही कराव म्हणून ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती आपण, यावर्षीच्या शिवजयंतीच्या निमित्ताने एक वचन देतो तूला, आपण एकत्रितपणे सुरु केलेल्या कार्यात कधीही खंड पडू देणार नाही मी… स्वराज्यवाटाच्या कार्याला कधीही अंतर देणार नाही… अगदी अखेरच्या श्वासापर्यंत.......

तुझा दुर्भागी मित्र,
भटक्या योगी

No comments:

Post a Comment